सांगली जिल्ह्यात केलेले कार्य
संकल्प विकासाचा, अविरत जनसेवेचा
कॉंग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, पलूस-कडेगाव मतदारसंघाचा आमदार व महाविकास आघाडी सरकारमधील विविध खात्यांचा राज्यमंत्री या नात्याने सांगली जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवून विविध विकासकामांना गती दिली. कॉंग्रेस पक्षाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी कार्य केले. आजही हे काम सुरू आहे.
- कोरोना आपत्तीच्या काळात सांगली जिल्ह्यात सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोना चाचणी, संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून नियोजन व अंमलबजावणी केली.
- कोव्हिडची साथ आटोक्यात आणण्यासाठी स्वत: पुढे होऊन विविध आघाड्यांवर काम केले. समाजातील विविध घटकांच्या बैठका घेऊन कोरोना संसर्गाबाबत जनजागृती केली. सांगली शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली व रुग्णांना दिलासा दिला.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्यामार्फत सॅनिटायझरची निर्मिती करून आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, लहान-मोठे व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना त्याचे मोफत वाटप केले. या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठकांना उपस्थित राहून प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या.
- कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात सक्रिय सहभाग घेतला.
- जिल्ह्यातील अन्नधान्य साठ्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठेही जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्यासंबंधी निर्देश दिले. भाजीपाला, द्राक्ष व ऊस वाहतुकीला तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेला कोणताही अडथळा येऊ नये याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
- कोरोना संसर्ग व लॉकडाऊन काळात सांगलीतील शिवभोजन थाळी केंद्रांना भेटी देऊन आढावा घेतला.
- अतिवृष्टी व पूर स्थितीमध्ये ब्रह्मनाळ व परिसरातील लोकांना ये-जा करण्यासाठी गैरसोय होत असल्याने डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीतून ब्रह्मनाळ येथे यांत्रिक बोटीचे लोकार्पण पालकमंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. बोट उलटून मोठी दुर्घटना घडू नये यासाठी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
