राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत पलूस-कडेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, पलूस येथील विविध उद्योजकांच्या अडचणींबाबत त्यांची भेट घेण्यात आली.
कडेगाव एम.आय.डी.सी.मध्ये 2006 साली स्व. आ. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रयत्नातून टेक्सटाईल पार्क सुरू झाले. 2010 पर्यंत 0 ते 60 उद्योगांच्या इमारतींमध्ये 170 हून अधिक युनिट्स कार्यरत होत्या. मात्र नोटबंदी, GST, वीजदरवाढ व कोरोनामुळे 90% उद्योग बंद पडले. परिणामी, उद्योजकांची कर्जे थकीत झाली.
त्यानंतर मी केलेल्या प्रयत्नांमुळे काही उद्योजकांनी OTS योजनेद्वारे कर्जफेड केली, मात्र अनेकांना BCC प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. आता टेक्सटाईल उद्योग मंदावल्याने उद्योजक इतर व्यवसायांकडे वळत असताना, केवळ 3 महिन्यांची नोटीस देऊन “उद्योग सुरू करा किंवा भूखंड परत द्या” अशा स्वरूपाच्या नोटिसा दिल्या जात आहेत. ही मुदत अत्यंत अल्प असल्याने उद्योजकांमध्ये अस्वस्थता आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील दोन प्रमुख मागण्या उद्योगमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या:
BCC प्रक्रियेसाठी मुदतवाढ व स्थानिक कार्यवाही:
ज्या उद्योजकांनी उद्योग सुरू करूनही इमारतींचे पूर्णत्वाचे दाखले (BCC) घेतलेले नाहीत, अशांना कमी शुल्क आकारून मुदतवाढ द्यावी. ही प्रक्रिया थेट उद्योग भवन, सांगली येथेच पार पाडावी, जेणेकरून फाईल मुंबईला पाठवण्याचा वेळ वाचेल.
उद्योग सुरू करण्यासाठी दिलेल्या मुदतीत वाढ:
एमआयडीसीने पाठवलेल्या नोटीसीत फक्त 3 महिन्यांची मुदत दिली आहे. ती कमीत कमी 12 ते 18 महिन्यांपर्यंत वाढवावी, अशी विनंती करण्यात आली.
या मागण्यांवर ना. उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
